जंगलात विविध प्रकारच्या वनस्पती कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय चांगल्या प्रकारे वाढतात. त्यांच्यात कोणत्याही अन्नद्रव्यांच्या कमतरता दिसून येत नाहीत. मात्र जेव्हा आपण रासायनिक पद्धतीने शेती करतो, तेव्हा अनेक प्रकारच्या कमतरता, रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. असे का व्हावे? याचा विचार आपण सातत्याने करीत होतो. अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी मानवाने शेतीत रासायनिक घटकांचा वापर सुरू केला, पण त्यातून चक्र बिघडले. माती आणि इतर सर्व संसाधनांकडून अधिक ओरबाडून घेण्याचे प्रमाण वाढले. गरजा अधिक म्हणून अधिक उत्पन्नाची गरज, पण यातून जे साध्य करायचे ते झालेच नाही. निसर्गाचे मात्र शोषण झाले, असे सुभाष पाळेकर यांचे म्हणणे आहे. मुख्य पिकांचा उत्पादन खर्च आंतरपिकांच्या उत्पन्नातून भरून काढणे आणि मुख्य पीक बोनस म्हणून घेणे म्हणजे ‘झिरो बजेट’, अशी सुभाष पाळेकर यांची सहज-सोपी संकल्पना आहे. आधुनिक पद्धतीने रासायनिक शेतीतून उत्पन्न वाढवायचे की, सेंद्रिय शेतीचा मार्ग स्वीकारायचा, अशा संभ्रमावस्थेत सापडलेल्या शेतकऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून ज्येष्ठ शेतीतज्ज्ञ सुभाष पाळेकर ‘झिरो बजेट’ नैसर्गि...